शहादा, दि.१३ (प्रतिनिधी)
नाशिकहून शहाद्याकडे येणाऱ्या शहादा आगाराच्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला आज सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने अथवा तांत्रिक बिघाडामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहरच्या झाडाला धडकून पलटी झाली. या अपघातात चालकासह आठ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची एमएच १४ एमएस २३१० क्रमांकाची बस नाशिकहून प्रवाशांना घेऊन शहाद्याकडे येत होती. सकाळच्या सुमारास बस उमराणे गावाजवळ पोहोचली असता अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर बसने रस्त्यालगतच्या मोठ्या झाडाला जोरदार धडक दिली आणि बस पलटी झाली.
बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून उमराणे गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. बसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या आठ प्रवासी आणि चालकाला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली.
हा अपघात चालकाला डुलकी लागल्याने झाला की बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेसच्या तांत्रिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा आगारातून बस सुटल्यानंतर काही अंतरावरच तांत्रिक बिघाड अथवा अपघाताच्या घटना घडत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया :
“मृत्यू समोर उभा होता, पण काळाने यू-टर्न घेतला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. मात्र, प्रत्येक आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यापूर्वी त्यांची तांत्रिक तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. आगार प्रमुख आणि तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” असे शहादा तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी म्हटले आहे.









