शहादा, दि.१४ (प्रतिनिधी)
शहादा शहरातून पुणे व मुंबईकडे धावणाऱ्या खासगी लक्झरी बस चालक-मालकांकडून सध्या प्रवाशांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हजारो रुपये भाडे आकारूनही या बसमध्ये मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि महिला प्रवाशांसाठी आवश्यक व्यवस्था नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. महागडे भाडे देऊनही जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
विशेषतः रात्रीच्या प्रवासात महिला प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक लक्झरी बसमध्ये चालकाच्या कॅबिनमध्येच क्षमतेपेक्षा अधिक आणि बेकायदेशीर प्रवासी बसवले जातात. त्यामुळे बसमधील मार्ग अरुंद होऊन महिलांना चालकापर्यंत पोहोचणे जिकिरीचे ठरते. नैसर्गिक विधीसाठी गाडी थांबवण्याची विनंती केल्यावर चालकांकडून उर्मट भाषेत उत्तर दिले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. “मागे हॉटेलवर गाडी थांबली होती तेव्हा काय करत होतात?” अशा शब्दांत महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. संकोचामुळे अनेक महिलांना त्रास सहन करतच प्रवास करावा लागत आहे.
अनेक खासगी लक्झरी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या, सीट खिळखिळे, लाईट व चार्जिंग पॉईंट बंद अशा स्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. एसी बसचे तीन ते चार पट भाडे आकारूनही थंडावा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही बसमधील क्लिनर मद्यप्राशन करून प्रवाशांशी हुज्जत घालत असल्याचेही समोर आले आहे. या तक्रारी मालकांकडे केल्यास फोन न उचलणे किंवा उलट प्रवाशांनाच दमदाटी केल्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
प्रवाशांनी असा खळबळजनक आरोप केला आहे की, “आरटीओ आमचे काहीही करू शकत नाही,” अशी भाषा काही बस चालक वापरत आहेत. शहादा ते पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या बसची प्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्त्यात तपासणी होत नसल्याने वाहनांचे फिटनेस, अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही, जीपीएस व विम्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच हे प्रकार सुरू असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून या बसेसची तातडीने तपासणी करावी, वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रवाशांची आर्थिक लूट थांबवावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आरटीओ विभागाने प्रत्येक गाडीचे चालक व क्लिनर यांची रस्त्यात तपासणी केल्यास अनेक गैरप्रकार उघडकीस येतील, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.



