कडेगाव प्रतिनिधी
आजच्या आधुनिकतेच्या आणि दिखाऊपणाच्या युगात विवाह सोहळे म्हणजे मोठा खर्च, डीजे, फटाक्यांची आतषबाजी आणि झगमगाट असे चित्र पाहायला मिळते. मात्र वांगी येथील औंधे आणि हडदरे कुटुंबाने या सर्वांपेक्षा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवत आपल्या मुलांच्या विवाह सोहळ्यात वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारा स्तुत्य उपक्रम राबवला.
स्वर्गीय बाळासाहेब औंधे यांच्या परिवारातील चिरंजीव ओंकार औंधे आणि उत्तम हडदरे यांच्या कन्या श्वेताली यांच्या विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांना हरिपाठ व धार्मिक पुस्तके भेट देण्यात आली. विवाहात आलेल्या प्रत्येकाला संस्कारांची आणि भक्तीची भेट मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
औंधे कुटुंब गेली अनेक वर्षे वारकरी संप्रदायाशी जोडलेले असून विठ्ठल भक्तीची परंपरा त्यांनी जपली आहे. दरवर्षी पारायण, भजन आणि हरिपाठ यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करून समाजात भक्ती आणि संस्कारांचे बीज रुजवण्याचे कार्य हे कुटुंब सातत्याने करत आहे.
विवाह सोहळ्यात फटाक्यांवरील आणि अनावश्यक दिखाऊ खर्च टाळून त्याऐवजी धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याने वाचन संस्कृतीलाही चालना मिळाली आहे. “नवदांपत्याच्या आयुष्याची सुरुवात संस्कार आणि भक्तीच्या मार्गाने व्हावी,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
समाजात वाढत चाललेल्या दिखाऊपणाच्या पार्श्वभूमीवर औंधे आणि हडदरे कुटुंबाने जपलेली ही परंपरा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.










