जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुका विकास परिषदेतर्फे जळकोट येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनात एसटी बस सेवा, बस आगार आणि बसस्थानकाच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे जळकोट येथे स्वतंत्र बस आगार मंजूर करून किमान २५ बसेस उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी केली आहे. तसेच जळकोट ते लातूर बससेवा दर एका तासाला सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय उदगीर ते नागपूर, उदगीर ते पुणे (रात्री ११ वाजता नियमित), उदगीर ते संभाजीनगर, उदगीर-जळकोट-नांदेड-माहूर, जळकोट ते परभणी, जळकोट-बाठाळी-देगलूर, जळकोट-निलंगा-अक्कलकोट आणि जळकोट ते हैदराबाद या बससेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे
जळकोट ते लातूर आणि जळकोट ते तिरका या मार्गावरील बसेस मुक्कामी ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच बसस्थानक परिसरात बोअरवेल किंवा विहीर मंजूर करणे, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह उभारणे, बसस्थानकाचे रखडलेले काम पूर्ण करणे आणि बसस्थानकावर एलईडी फलक बसविणे या मागण्यांचाही समावेश आहे.
“वरील सर्व मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
हे आंदोलन गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी तहसील कार्यालय, जळकोट, जिल्हा लातूर येथे सुरू करण्यात आले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









