रिसोड : प्रतिनिधी
रिसोड शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे. सकाळी अवकाळी पाऊस, दुपारी प्रचंड उष्णता आणि रात्री ढगाळ वातावरण अशा सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे.
गेल्या दहा दिवसांत सर्दी, खोकला, ताप, उलटी-जुलाब, डिहायड्रेशन तसेच व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका बसत आहे. काही रुग्णांमध्ये उष्माघाताची लक्षणेही आढळून येत आहेत.
डॉक्टरांच्या मते, तापमानातील अचानक बदलामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत असून पाऊस आणि उष्णतेच्या मिश्र परिणामामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रिसोड शहरात वारंवार चार ते पाच तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीज नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील दवाखान्यांमध्ये टायफॉईड, मलेरिया आणि व्हायरल आजारांच्या रुग्णांची गर्दी वाढताना दिसत आहे.
नागरिकांनी विद्युत महामंडळाने तातडीने लक्ष घालून नियमित वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. तसेच वातावरणातील बदल आणि वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागानेही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांसाठी डॉक्टरांचा सल्ला :
- दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे
- बाहेर पडताना पाणी आणि छत्री सोबत ठेवावी
- उकळलेले व स्वच्छ पाणी प्यावे
- उघड्यावरचे अन्न टाळावे
- परिसरात पाणी साचू देऊ नये
- लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी








