गडचिरोली प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर व्हेंटिलेटर बंद पडल्याने एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
प्रसूतीनंतर बाळाची प्रकृती खालावली
कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील संजना संदीप कुमरे (वय २३) यांना ११ मे रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी सुमारे दोन वाजता त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र जन्मानंतर काही तासांतच नवजात बाळाची प्रकृती चिंताजनक बनली.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास डॉक्टरांनी बाळाची स्थिती गंभीर असल्याचे सांगत तातडीने चंद्रपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला.
रुग्णवाहिकेसाठी दीड तास प्रतीक्षा
जिल्हा मुख्यालयातील रुग्णालय असूनही वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कुटुंबीयांची मोठी धावपळ झाली. ‘१०८’ आपत्कालीन सेवेशी संपर्क साधल्यानंतरही रुग्णवाहिका येण्यास दोन तास लागतील, असे सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेर दीड तास प्रतीक्षा करूनही वाहन न मिळाल्याने बाळाला रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) दाखल करण्यात आले.
वीज खंडित, इन्व्हर्टरही बंद
उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. विशेष म्हणजे बॅकअपसाठी असलेली इन्व्हर्टर यंत्रणाही बंद पडल्याने व्हेंटिलेटर थांबले. ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुमरे कुटुंबीयांनी केला आहे.
या घटनेनंतर रुग्णालयातील आपत्कालीन यंत्रणा, वीज बॅकअप व्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रशासनाचा खुलासा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम यांनी उपचारात कोणतीही हलगर्जी झाल्याचे नाकारले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “बाळाचा जन्म मुदतपूर्व (Premature) झाला होता. त्याचे वजन कमी होते आणि प्रकृती अत्यंत नाजूक होती. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असून उपचारात कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नाही.”
नागरिकांमध्ये संताप
या घटनेनंतर जिल्ह्यातील नागरिकांनी संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयातील आपत्कालीन सुविधा, रुग्णवाहिका व्यवस्था आणि बॅकअप यंत्रणा सक्षम करण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
मुख्य मुद्दे :
- वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटर बंद पडल्याचा आरोप
- बॅकअप इन्व्हर्टर यंत्रणाही निकामी
- रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने उपचारात विलंब
- नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू
- आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित









