दौंड | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा टीम दौंड आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रावणगाव (ता. दौंड) येथे आयोजित करण्यात आलेले एक दिवसीय ‘गट शेती’ प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. तालुका कृषी अधिकारी श्री. अजिंक्य दुधाने यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये शेतकऱ्यांना गट शेतीचे महत्त्व, त्याचे फायदे, व्यवस्थापन आणि भविष्यातील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “गट शेती ही काळाची गरज आहे” हा संदेश प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कार्यक्रमात पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. सुखदेव तात्या भोसले, मास्टर ट्रेनर ॲड. रवींद्र पोमणे, तालुका समन्वयक श्री. मयुर साळुंके आणि गुंजन निकम मॅडम यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कमी खर्चात अधिक उत्पादन, सामूहिक नियोजन आणि आधुनिक शेती पद्धती याविषयी माहिती देताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देण्यात आली.
महिला व पुरुष शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या प्रशिक्षणाचे विशेष आकर्षण म्हणजे महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. दूरवरच्या भागांतून आलेल्या शेतकऱ्यांनी गट शेतीबाबत उत्सुकता दाखवत या उपक्रमाचे स्वागत केले. प्रशिक्षणानंतर अनेक शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास रावणगाव ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. निर्मला ताई आटोळे, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनकर आटोळे, प्रगतशील शेतकरी श्री. लक्ष्मण तात्या रांधवण आणि परिवहन अधिकारी श्री. दत्तात्रय गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशस्वी आयोजनासाठी परिश्रम
हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड, आत्मा टीम आणि पाणी फाऊंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रकाश लोणकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अंगद शिंदे यांनी मानले.
गट शेती चळवळीला मिळणार गती
रावणगाव येथे झालेल्या या प्रशिक्षणामुळे दौंड तालुक्यात गट शेती चळवळीला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे. सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









