लातूर प्रतिनिधी
मे महिना मध्यावर आला असून नागरिकांना आता पावसाळ्याचे वेध लागले आहेत. मात्र यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे लातूर जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णताजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ९५१ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
यंदा एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. प्रखर उन्हामुळे सनबर्न, हिट क्रॅम्प्स, हिट एग्झॉर्शन आणि उष्माघातासारख्या विकारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या रुग्णांवर उपचार करण्यात आले. एप्रिल महिन्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ आरोग्य संस्थांमध्ये ३९५ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर १ मार्च ते १ मे या कालावधीत जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू करण्यात आलेल्या उष्माघात कक्षांमध्ये ५५६ रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
उष्णतेमुळे थकवा, ताप, त्वचेवर पुरळ येणे, हातापायांना गोळे येणे, त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे आणि नाडीचे ठोके वेगाने होणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि शेतमजुरांना याचा अधिक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने मार्च महिन्यापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून औषधसाठा उपलब्ध करून देणे, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे तसेच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
