जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
बियाणे व खत वितरणात सुसूत्रता ठेवण्याच्या सूचना
लातूर | दि. १४ प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’चा संभाव्य परिणाम होण्याचा अंदाज वर्तविल्याने आगामी खरीप हंगामासाठी प्रशासनाने आवश्यक सज्जता ठेवावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे आणि खत वापराबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगाने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. यावेळी विधान परिषद आमदार तथा मुख्य प्रतोद विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह पशुसंवर्धन, वन, आत्मा आणि अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री भोसले म्हणाले की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत होणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात खत व बियाणे उपलब्ध ठेवून कोणत्याही तालुक्यात तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महाबीज बियाणे वितरणाबाबत कोणतीही तक्रार येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
‘एल-निनो’मुळे मान्सून अनिश्चित राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना योग्य पेरणी कालावधीबाबत सातत्याने मार्गदर्शन करावे. संभाव्य दुबार पेरणीची वेळ आल्यास पुरेशा बियाण्यांचा साठा उपलब्ध राहील, यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर, पर्यायी पीक पद्धती आणि योग्य वाण निवडीबाबत कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्ह्यात वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनावरही भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची माहिती दिली. यंदा जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी ३ लाख ६४ हजार २४८ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २ लाख ३६ हजार ७६१ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून उर्वरित बियाणे महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि खासगी कंपन्यांकडून उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी सुमारे १ लाख ४५ हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज भासेल, असा अंदाज असून त्यानुसार महिनानिहाय पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बोगस बियाणे व खत विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथके कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत आमदार विक्रम काळे, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि आमदार रमेश कराड यांनीही विविध सूचना मांडल्या.

