मान्सूनपूर्व नालेसफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार प्रशासनाला निर्देश
लातूर | प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व नालेसफाई कामांना गती देत पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी प्रशासनाला दिले आहेत. शहरातील कोणत्याही भागात पाणी साचू नये किंवा नाल्या तुंबू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
महानगरपालिकेकडून शहरात नालेसफाईची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून, या कामांची प्रत्यक्ष पाहणी स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी केली. माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली. यावेळी गटनेते विजयकुमार साबदे, उपायुक्त वसुधा फड, स्वच्छता विभागाचे अधिकारी रमाकांत पिडगे, कलीम शेख आदी उपस्थित होते.
दरवर्षी १ मेपासून सुरू होणारी नालेसफाई मोहीम यंदा मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन एक महिना आधीच सुरू करण्यात आली आहे. शहरातील चारही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चार लहान व दोन मोठ्या जेसीबी, एक पोकलेन आणि सहा हायवा यांच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे.
गतवर्षीच्या पावसात शहरातील अनेक भागांत नाल्या तुंबून अस्वच्छता आणि पाणी साचण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. यंदा अशा समस्या टाळण्यासाठी नालेसफाई प्रभावीपणे करण्याच्या सूचना सभापती बंडापल्ले यांनी दिल्या. विशेषतः रिंग रोड, पाच नंबर चौक आणि समांतर रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने त्या भागात कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था उभारण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील प्रत्येक गल्ली-बोळातील नाल्यांची नियमित साफसफाई करून कचरा अडकणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांचाही विचार करून नालेसफाईच्या कामात कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपायुक्त वसुधा फड यांनी शहरातील नालेसफाईचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. सभापतींनी केलेल्या सूचनांनुसार उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील काही भागात नाल्यांवरील पुलांवर पाणी साचून वाहनधारकांचे अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले आणि मनपा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. ज्या ठिकाणी नाल्या तुंबून पुलांवर पाणी येते, त्या ठिकाणच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.







