महाराजस्व समाधान शिबिरात घोषणा
सहा महिन्यांत नगरपरिषद प्रश्नही मार्गी लागणार
लातूर | दि. १५ प्रतिनिधी
मुरुडसारख्या मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावात अनेक वर्षांपूर्वीच नगर परिषद आणि तहसील कार्यालय सुरू होणे अपेक्षित होते. शासनस्तरावरील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या महिनाभरात मुरुड येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद स्थापनेबाबतचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला असून उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून पुढील सहा महिन्यांत नगरपरिषदेचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत लातूर तालुक्यातील मुरुड येथे आयोजित समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, तहसीलदार सौदागर तांदळे, अतिरिक्त गटविकास अधिकारी सतीश चोरमले, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, संगायो समिती अध्यक्ष बन्सी भिसे, पंचायत समिती सदस्या पंकज गायकवाड, सुचिता अंधारे तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. कराड म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. “जनतेचे समाधान होईपर्यंत हे शिबिर सुरू राहणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध भागांमध्ये आयोजित समाधान शिबिरांतून शेकडो नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद शेतरस्ता योजनेअंतर्गत पुढील दोन वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ते पोहोचवले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
घरकुल योजनांपासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत, “स्वतःचे कबाले नसल्याने अनेकांना योजनांचा लाभ मिळत नाही. शासनाने कबाले देण्याचा निर्णय घेतला असून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही,” असे आ. कराड यांनी सांगितले.
मुरुड येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत पुढील आठ दिवसांत हा प्रश्न निकाली काढण्याची सूचना केली.
यावेळी समाधान शिबिरात विविध योजनांअंतर्गत लाभांचे वितरण करण्यात आले. लखपती दीदी प्रमाणपत्र, लेक लाडकी योजनेचा हप्ता, बेबी केअर किट, शेळी गट वाटप, गाव नकाशे, संगायो योजनेची मंजुरीपत्रे, डिजिटल शिधापत्रिका, आयुष्यमान भारत कार्ड, रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्रे, जिवंत सातबारा तसेच स्वयंसहायता समूहांना धनादेश वितरण करण्यात आले. काही लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचेही वाटप करण्यात आले.
उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार गणेश सरवदे यांनी केले तर आभार महेश कणसे यांनी मानले. समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


