लातूर, दि. १६ मे २०२६ :
दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर येथे बी. फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक १६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाजिद चाऊस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात भरभरून यश संपादन करावे, नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात तसेच एक यशस्वी फार्मासिस्ट म्हणून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बी. फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या. अंतिम वर्षातील विद्यार्थिनी अदिबा शेख व विद्यार्थी कृष्णा देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बी. फार्मसी तृतीय वर्षातील निकिता काळे, श्रीदत्त शेटकर, सुजाता भालके आणि श्रद्धा देशमुख यांनी केले. प्रा. सुषमा पांचाळ यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून प्रा. अविनाश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रा. अरुण कोंडापुरे, प्रा. गणेश तोडकर, प्रा. प्रतीक चिंचोले, प्रा. ओम पाटील, प्रा. खालिद शेख, प्रा. मुस्कान पठाण यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


