लातूर | प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल १० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीच्या दागिन्यांची बॅग सुरक्षितपणे मूळ मालकास परत करून खाकी वर्दीतील संवेदनशीलता आणि नैतिकतेचे दर्शन घडवले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.१६ मे २०२६) रोजी रात्री ११ ते ११.४० वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड हे आपल्या मित्रासह खाजगी वाहनाने जात असताना सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील गेट परिसरात रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद काळी बॅग पडलेली दिसली.
कर्तव्यदक्षतेने त्यांनी वाहन थांबवून बॅगची पाहणी केली. सुरुवातीला बॅगेत लहान मुलांचे कपडे, पॅम्पर्स आणि इतर साहित्य आढळले. मात्र सखोल तपासणीदरम्यान कपड्यांच्या खाली ठेवलेली एक पोटळी दिसून आली. ती उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असल्याचे आढळून आले.
प्राथमिक अंदाजानुसार, बॅगेत ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे १ तोळा चांदीचे दागिने होते. या सर्व ऐवजाची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
ही बॅग एखाद्या कुटुंबाकडून दुचाकीवरून प्रवास करताना नकळत पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन बॅग सुरक्षित ताब्यात घेतली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही तासांतच बॅगेच्या मूळ मालकाचा शोध लावण्यात यश मिळवले. ही बॅग प्रकाशनगर, लातूर येथील सौ. ज्योती प्रतीक पांचाळ यांची असल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रविवारी (दि.१७ मे २०२६) रोजी हा मुद्देमाल पांचाळ कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
आपली मौल्यवान बॅग सुरक्षित परत मिळाल्याने पांचाळ कुटुंबीयांनी लातूर पोलिसांचे आभार मानले.
या प्रामाणिक कार्याबद्दल पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड यांचे कौतुक केले आहे.
खाकी वर्दीतही माणुसकी, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता जिवंत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, लातूर जिल्हाभरातून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










