अहमदपूर-नागठाणा मार्गावरील भीषण अपघातानंतर प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप
अहमदपूर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगाराची अहमदपूर-नागठाणा ही एसटी बस नागठाण्याहून ४३ प्रवासी घेऊन अहमदपूरकडे येत असताना लांजी आणि तांबडसांगवी गावादरम्यान भीषण अपघात झाला. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाला बाजू देताना बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बसमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. अपघात होताच परिसरातील शेतकरी आणि वाहनचालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर खाजगी वाहने, रुग्णवाहिका आणि शासकीय रुग्णवाहिकांच्या मदतीने सर्व जखमींना अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अरुंद रस्त्यामुळे दुर्घटना
बस चालक नारायण केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागठाण्याहून अहमदपूरकडे येत असताना समोरून एक टाटा ४०७ मालवाहू वाहन भरधाव वेगाने आले. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनाला जागा देण्यासाठी बस साईडपट्टीवर घेण्यात आली. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेली भुसभुशीत आणि कमकुवत साईडपट्टी बसचा भार सहन करू शकली नाही आणि बस थेट खाली घसरून पलटी झाली. अपघातानंतर संबंधित टेम्पो चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला.
प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या लांजी-अंधोरी मार्गाची रुंदी केवळ १२ फूट असून ती वाढवून १५ फूट करण्याची मागणी ग्रामपंचायतीने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
“रस्ता अरुंद असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते,” असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आजचा अपघात घडल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत या मार्गावर झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आता तरी जागे होऊन रस्त्याचे रुंदीकरण आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










