लातूर शहरातील ८४ नाल्यांची ७० टक्के स्वच्छता पूर्ण; ३१ मेपूर्वी संपूर्ण काम पूर्ण होणार
लातूर | प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत शहरातील प्रमुख ८४ नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली.
महापौर जयश्री सोनकांबळे, मनपा आयुक्त मानसी मीना, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले आणि उपमहापौर स्नेहल उटगे यांच्या आदेशानुसार दि. ५ एप्रिलपासून नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
या कामासाठी शहरातील चार क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून ४ छोटे जेसीबी, २ मोठे जेसीबी, १ पोकलेन आणि ६ हायवा वाहनांच्या सहाय्याने सफाई मोहीम राबविण्यात येत आहे.
दरवर्षी १ मेपासून सुरू होणारी नालेसफाई यंदा एक महिना अगोदर सुरू करण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील पाणी निचऱ्याची व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
आतापर्यंत शारदानगर, इंडिया नगर, सुळ नगर, आर्वी गायरान, जुनी एमआयडीसी परिसर, धनगरवाडा, जिजामाता नगर, खाडगाव रोड, बाबा नगर, वडारवाडा, गजानन नगर, देसाई नगर, कन्हेरी गाव, छत्रपती चौक, साठे नगर, इस्लामपुरा, गंगाधाम सोसायटी, रिंग रोड, सिद्धेश्वर नगर, रामचंद्र नगर, नांदगाव वेस्ट, डी-मार्ट परिसर, गरुड चौक, कुंभार चौक यांसह विविध भागातील मोठे व कच्चे नाले साफ करण्यात आले आहेत.
मनपाच्या वतीने नालेसफाईनंतर तातडीने कचरा उचलण्याची कामेही करण्यात येत आहेत. उर्वरित नाल्यांची सफाई येत्या ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



