सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी / इंदापूर
इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी, हिंगणेवाडी आणि सणसर ग्रामपंचायतींच्या वॉर्डरचना प्रक्रियेवर गंभीर आरोपांचे सावट निर्माण झाले असून संपूर्ण प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ग्रामस्थांनी ग्रामसेवक, तलाठी, सर्कल अधिकारी, तहसीलदार आणि प्रांत कार्यालयावर राजकीय दबावाखाली मनमानी पद्धतीने वॉर्डरचना केल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
माहिती अधिकारातून मागवण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी “जिल्हाधिकारी कार्यालयातून अंतिम सही झालेली कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत,” असे तहसील कार्यालयातील क्लार्क जनक माने यांनी सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र, असे असताना तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दि. ४ मे २०२६ रोजी वॉर्डरचनेचा निकाल कोणत्या कायदेशीर आणि प्रशासकीय आधारावर जाहीर केला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. “कागदपत्रेच अंतिम नाहीत, तर निकाल कसा अंतिम?” असा थेट प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सपकळवाडीतील वॉर्ड क्रमांक ३ संदर्भात ग्रामस्थांमध्ये विशेष संताप व्यक्त होत आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्वेकडील भागात असलेला हा वॉर्ड दक्षिणेकडून उत्तरेकडे नैसर्गिक रचनेने विस्तारलेला असताना त्याचे विभाजन करण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते, वॉर्ड क्रमांक १ आणि २ मध्येच प्रत्यक्ष विभाजन होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने ते टाळून वॉर्ड क्रमांक ३ वरच कारवाई का केली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, २०२० मध्ये वॉर्ड क्रमांक ३ मध्ये तीन उमेदवार होते आणि मतदारांना तीन मतांचा अधिकार होता. आता २०२६ मध्ये वॉर्ड क्रमांक १ मध्ये तीन उमेदवारांची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या भागातील ग्रामस्थांना पुन्हा तीन मतांचा अधिकार देण्यात आला आहे. मग वॉर्ड क्रमांक ३ मधील ५४ मतदारांना तोच अधिकार घाईघाईने का देण्यात आला? यामागे कोणाचा राजकीय दबाव किंवा संगनमत आहे का, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, ग्रामसेवक उज्वला भगत, सर्कल अधिकारी शरद गोडे आणि ग्रामसेवक अरुण जाधव यांनी सपकळवाडी, हिंगणेवाडी आणि सणसर गावांची वॉर्डरचना प्रक्रिया गावात न करता श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर येथील गेट हाऊसमध्ये काही ठराविक राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यामुळे “लोकशाही प्रक्रिया ग्रामसभेत झाली की गेट हाऊसच्या बंद खोलीत?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रक्रियेविरोधात सपकळवाडी येथून शत्रुघ्न घाडगे, हिंगणेवाडी येथून संतोष चव्हाण, कृष्णा कदम आणि सणसर येथून अभयसिंह निंबाळकर यांनी अधिकृत हरकती व जबाब सादर केले होते. मात्र या हरकतींचा कोणताही विचार न करता संपूर्ण वॉर्डरचना “जैसे थे” ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष पाहणीसाठी कोणताही अधिकारी गावात आलेला नसताना वॉर्डरचनेचा अंतिम निर्णय घेतल्याचा दावा अर्जदारांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन प्रत्यक्ष पंचनामा, लोकसंख्या अभ्यास आणि भूगोल न पाहताच केवळ कागदोपत्री निर्णय घेत आहे का, अशी चर्चा गावोगावी सुरू झाली आहे.
ग्रामस्थांनी संबंधित तलाठी, सर्कल अधिकारी आणि ग्रामसेवक यांचे तात्काळ निलंबन करून संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन किंवा विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेऊन संपूर्ण वॉर्डरचना रद्द करण्यासाठी कायदेशीर लढा उभारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वॉर्डरचना प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










