धारूर: तालुक्यातील हिंगणी येथील तलावात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या मुलींपैकी तिघीजण मासेमारीच्या होडीत बसल्या असता, अचानक होडी उलटून दोन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. पलक शामराव पारवे (वय १४, रा. हिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) अशी मृत मुलींची नावे आहेत. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेमुळे संपूर्ण हिंगणी परिसरावर मातमी कळा पसरली आहे.
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाच मुली तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या. तेथे काठावर उभ्या असलेल्या मासेमारीच्या होडीवर केवळ कौतुकापोटी पलक, दिव्या आणि मोहिनी पारवे या तिघीजण बसल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने होडी अचानक उलटली आणि तिघीही खोल पाण्यात बुडू लागल्या. काठावरील लहान मुलींनी आरडाओरडा केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ तलावाकडे धाव घेतली.
ग्रामस्थांनी तत्परतेने पाण्यात उड्या मारून तिन्ही मुलींना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. या थरारात मोहिनी पारवे हिला शुद्ध आली आणि ती सुदैवाने बचावली. मात्र, पलक आणि दिव्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या निष्पाप चिमुरड्यांच्या अकाली जाण्याने मृत मुलींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


