छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाची जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठक पार पडली. सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
बियाणे व खतांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सूचना
बैठकीदरम्यान पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी कृषी विभागाला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची टंचाई भासता कामा नये. यासाठी पुरेशा प्रमाणात साठवणूक ठेवावी आणि कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी.
पिक नियोजनावर भर
बैठकीत जिल्ह्यातील संभाव्य पर्जन्यमान, उपलब्ध पाणीसाठा तसेच विविध पिकांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या कृषी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
पीक विमा योजनांचाही आढावा
खरीप हंगामात खते व बियाण्यांचा पुरवठा सुरळीत राहावा यासोबतच पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी, कृषी अधीक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.










