वर्धा | प्रतिनिधी
पोलिस दलातील वाढती कामाची व्याप्ती, अनियमित कामाचे तास आणि सततच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे निर्माण होणारा मानसिक ताण लक्षात घेऊन वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष “तणाव-तणाव व्यवस्थापन” मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामान्य रुग्णालय, वर्धा येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुदर्शन हरले, त्यांच्या पत्नी श्रीमती सोनल हरले आणि त्यांच्या टीमची उपस्थिती लाभली.
मानसिक आरोग्य जपणे गरजेचे
मार्गदर्शन करताना डॉ. सुदर्शन हरले यांनी सांगितले की, पोलिस दल हे समाजाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत असते. सततच्या जबाबदाऱ्या आणि आव्हानात्मक परिस्थितीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांवर मानसिक आणि शारीरिक ताण निर्माण होतो. हा ताण वेळेवर नियंत्रित न केल्यास नैराश्य आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
त्यांनी तणावाची लक्षणे ओळखणे, सकारात्मक विचारसरणी ठेवणे आणि दैनंदिन जीवनात छोटे बदल करून मानसिक संतुलन राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
ध्यानधारणा व मानसिक व्यायामाचे मार्गदर्शन
श्रीमती सोनल हरले आणि त्यांच्या टीमने पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा, मानसिक व्यायाम आणि सकारात्मक विचार विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. व्यस्त दिनचर्येत स्वतःच्या आरोग्यासोबत कुटुंबासाठी वेळ देणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराला वर्धा पोलीस दलातील ६ वरिष्ठ अधिकारी तसेच विविध पोलीस ठाण्यांतील आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील सुमारे १०० पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा नियमित आयोजित करण्याची गरज व्यक्त केली.

