– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
लातूर | प्रतिनिधी
गतवर्षी अहमदपूर तालुक्यात विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत झाली असून, याच धर्तीवर यंदाही नदी-नाले खोलीकरण आणि बॅरेज परिसरातील सरळीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. आपल्या गावात पडणारे पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
अहमदपूर तालुक्यातील गुगदळ येथे महाराष्ट्र शासनाचा मृद व जलसंधारण विभाग, नाम फाऊंडेशन, सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नदी खोलीकरण व रुंदीकरण मोहिमेचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील सात गावांमध्ये नदी-नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना मंत्री श्री. पाटील म्हणाले की, “गावातील पाणी गावात आणि शिवारातील पाणी शिवारात जिरवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट घडवून आणण्याचा शासनाचा मानस आहे.”
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तम माने, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्लचंद्र गुंडरे, अश्विन नागराळे, भानुदास पोटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, गट विकास अधिकारी पंकज शेळके, सिद्धी शुगरचे कार्यकारी संचालक अविनाश जाधव, नाम फाऊंडेशनचे विलास चामे, टाटा मोटर्स फाऊंडेशनचे प्रमोद घायाळ आणि उत्तम सुरनर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सहकार मंत्र्यांनी प्रत्येक गावात शोषखड्डे निर्माण करून भूजल पुनर्भरणाला चालना देण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांनी शेतीसोबत दुग्ध व्यवसायासारखे पूरक व्यवसाय स्वीकारावेत, माती परीक्षण करूनच खतांचा समतोल वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून दळणवळण, आरोग्य, घरकुल, दिवसा वीजपुरवठा आणि सूक्ष्म सिंचनासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनीही जलसंधारणाच्या कामांबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित करत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करावा, असे आवाहन केले.
दरम्यान, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील थोडगाव येथील पाझर तलाव, शेणकुड, येस्तार आणि मावलगाव येथील बॅरेज कामांची पाहणी केली. तसेच गुगदळ येथील नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.


