येवला प्रतिनिधी –
सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटल असलेला कांद्याचा भाव अचानक ६०० ते ७०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
एकाच दिवसात तब्बल ४०० रुपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली.
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र अचानक झालेल्या दरघटीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांसाठी परवडणारा नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी कांद्याला हमीभाव द्यावा तसेच शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावे, अशी मागणी केली.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहताना त्यात राजकारण होऊ नये. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, लासलगाव बाजार समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी पुढील भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.








