प्रतिनिधी – विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील विक्रमगडसारख्या आदिवासी तालुक्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने २०१५ मध्ये सुरू झालेल्या चिंचघर येथील ज्ञानरचना इंग्रजी शाळेने यंदा इतिहास घडवला आहे. शाळेच्या दहावीच्या पहिल्याच तुकडीने शंभर टक्के निकालाची नोंद करत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्व ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी सात विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. विशेष म्हणजे विक्रमगड तालुक्यातील संपूर्ण इंग्रजी माध्यमातील ही पहिली शाळा मानली जाते.
ज्ञानरचना एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चालविण्यात येणारी ही शाळा पूर्णपणे खासगी विनाअनुदानित स्वरूपात कार्यरत आहे. अवघ्या ११ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शाळेने आज ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण निर्माण केला आहे. अनेक विद्यार्थी दररोज ८ ते १० किलोमीटरचा प्रवास करून शिक्षणासाठी शाळेत येतात.
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन व्हावे यासाठी रविवारी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला केवळ ज्ञानरचना शाळेचेच नव्हे तर पंचक्रोशीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेत केंद्रीय जीएसटी कार्यालयातील अधीक्षक सोमयाजी नारायणन, समुपदेशक मानसशास्त्रज्ञ डॉ. मानसी आमडेकर, कोकुयो रिद्धी प्रा. लि. चे संचालक कमल पारेख तसेच मो. ह. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक संदीप आडारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दहावी-बारावीनंतर करिअरची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात, विविध क्षेत्रांतील संधी, स्पर्धा परीक्षा, सैन्यदल, फार्मसी, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रांबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करताना तज्ज्ञांनी आत्मविश्वास, सातत्य आणि योग्य दिशा यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. सुहास पाटील यांनी केले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचना इंग्रजी शाळेचे कार्य प्रेरणादायी ठरत असून, शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी वाट खुली होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








