कन्नड | प्रतिनिधी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर जांबरगाव इंटरचेंज येथे ऐतिहासिक ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले. शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी महामार्गावर उतरल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
कांदा दरातील मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली. “कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी या सरकारला दाखवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा यावेळी अंबादास दानवे यांनी दिला.
‘नाफेड’ खरेदीसह हमीभावाची मागणी
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याचे बाजारभाव सातत्याने घसरत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी शासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या :
- नाफेडमार्फत तात्काळ व मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करावी
- कांद्याला प्रति क्विंटल किमान ₹२,००० हमीभाव जाहीर करावा
- शेतकऱ्यांना ₹१,५०० अनुदान द्यावे
- कांदा निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवावी
- खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे
- कांदा चाळ उभारणीस ७५ टक्के अनुदान द्यावे
- दर्जेदार बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत
सरकारला आंदोलनाचा इशारा
आंदोलनादरम्यान बोलताना अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करत सांगितले की, “शेतकरी अडचणीत असताना सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या आंदोलनात जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.








