| गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळ, एमआयडीसी आणि इतर प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या विरोधात आज हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धरणे आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत “माती ही आमची माय आहे, शेवटच्या श्वासापर्यंत तिचे रक्षण करू,” असा निर्धार व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रस्तावित विमानतळासाठी गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी आदी गावांमध्ये प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले असून, स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विरोध असूनही प्रशासनाकडून बळजबरीने प्रक्रिया राबवली जात आहे.
तसेच चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १४ गावांतील जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या बैठकीत जमिनी घेणार नसल्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही संबंधित गावांतील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही, तर ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी डॉ. नामदेव किरसान यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. त्यांची भूमिका हीच आमची भूमिका आहे,” असे सांगितले.
या आंदोलनात विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, काँग्रेस पदाधिकारी, विविध पक्षांचे नेते, महिला, युवक आणि हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.







