पातुर प्रतिनिधी
नवेगाव ग्रामपंचायत परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात जागोजागी सांडपाणी साचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावातील अंतर्गत नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्यामुळे अनेक नाल्या कचरा आणि गाळाने तुंबल्या आहेत. परिणामी नाल्यांमधील घाण पाणी थेट रस्त्यावर वाहत असून नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी साचून राहत असल्याने डासांची पैदास वाढली असून गावात डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि मागण्या केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. सांडपाण्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पावसाळा तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाने अद्याप प्रभावी उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने नाल्यांची स्वच्छता करून सांडपाणी व्यवस्थापन सुधारावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.








