संभाजी ब्रिगेडचे कृषी विभागाला निवेदन; साठेबाजी, जादा दरवाढ व कागदावरील पावत्यांप्रकरणी कारवाईची मागणी
मंठा | प्रतिनिधी
मंठा तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक कृषी सेवा केंद्रांकडून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेड, मंठा यांच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी, मंठा यांना सविस्तर निवेदन देत संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडच्या निवेदनानुसार, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांकडून शासनाने निश्चित केलेल्या एमआरपीपेक्षा जादा दराने खत विक्री केली जात आहे. काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत असून “खतांचा साठा कमी आहे” तसेच “पुढे दर आणखी वाढणार आहेत” अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दराने खत खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच अनेक कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना अधिकृत संगणकीय जीएसटी बिल न देता साध्या कागदावर पावत्या दिल्या जात असल्याची बाबही समोर आली आहे. काही ठिकाणी कोणतीही पावती दिली जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय खत खरेदीसोबत इतर साहित्य घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडने तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची संयुक्त तपासणी करून खतसाठा, खरेदी-विक्री नोंदी व बिलिंग प्रणालीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अधिकृत जीएसटी बिल न देणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच साठेबाजी करणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र जनआंदोलन, धरणे आंदोलन व घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाध्यक्ष बालासाहेब भगवान खवणे यांनी दिला आहे.
यावेळी आसाराम झोल, गजानन गायकवाड, अशोक हिवाळे, बाळासाहेब सोळंके, सतीश आवचार, शिवाजी जाधव, सचिन गबाळे, गजानन राठोड, संजय चव्हाण, धोंडीराम घोरसड आदी उपस्थित होते.







