आजरा | प्रतिनिधी
संकेश्वर ते बांदा मार्गावरील आजरा एमआयडीसीजवळ सुरू होत असलेल्या टोल वसुलीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. स्थानिक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची लेखी उत्तरे मिळाल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही, असा आक्रमक इशारा देत शिवसेनेच्या वतीने आजरा तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात टोल प्रशासन आणि संबंधित विभागाला विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. संकेश्वर-बांदा मार्गावरील टोल वसुलीत आजरा तालुक्यातील खाजगी व व्यावसायिक वाहनधारकांना टोलमाफी कोणत्या निकषांवर आणि किती वर्षांसाठी दिली जाणार, याबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगत असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याचाही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील संभाजी चौकात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या समस्येवर प्रशासन कोणती उपाययोजना करणार, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
टोल सुरू करण्याच्या हालचाली वेगात सुरू असताना अनेक गावांमध्ये अद्याप बसथांबे उभारण्यात आलेले नाहीत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा टोल नाका किटवडे येथे स्थलांतरित करण्याबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
याशिवाय आजरा साखर कारखान्याच्या कामगारांची वाहने तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोलमधून पूर्ण माफी देण्यात येणार का, याबाबतही प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने वरील सर्व प्रश्नांबाबत तातडीने लेखी माहिती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून टोलचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, दिनेश कांबळे, सुयश पाटील, चंदर पाटील, संजय येसादे, समीर चांद, शिवाजी आढाव, बिलाल लतीफ, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.








