आजरा, प्रतिनिधी :
आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळत नसल्याबद्दल सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
नगराध्यक्ष अशोककुमार चराटी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी स्वागत केले, तर विषयांचे वाचन निहाल नाईकवाडे यांनी केले.
पाणीप्रश्न आठ दिवसांत सोडवण्याचे निर्देश
सभेत शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत राहिला. पाटील कॉलनी परिसरातील पाणीटंचाई तातडीने दूर करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यासंदर्भात ठेकेदार, जीवन प्राधिकरण अधिकारी आणि नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित ठेकेदार बैठकीला अनुपस्थित राहिल्यास त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला.
कचरा व्यवस्थापनावरही जोरदार चर्चा
शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवरूनही सभेत चर्चा रंगली. बाजारपेठ परिसरातील कचऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. तसेच पावसाळ्यापूर्वी गटारींची स्वच्छता पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
वाढीव कराला नगरसेवकांचा विरोध
नगरपंचायतीच्या दुकानगाळ्यांच्या भाड्यात ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सभेत मांडण्यात आला. मात्र वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला. “नागरिकांना प्रथम दर्जेदार सुविधा द्या, त्यानंतरच करवाढीचा विचार करा,” अशी ठाम भूमिका नगरसेवकांनी मांडली.
सभेस अभिषेक शिपी, अनिकेत चराटी, परेश पोटदार, डॉ. इंद्रजित देसाई, विक्रम पाटेकर, परशुराम बामणे, आसिफ पटेल, स्मिता कुंभार, पूनम लिमये, निशांत चांद आदी नगरसेवक उपस्थित होते.








