कळंबोली | प्रतिनिधी
कळंबोली येथील सेक्टर १३ मधील झुडीओ कॉर्नर ते सिडको कार्यालय या मार्गावरील नव्याने विकसित करण्यात आलेल्या फुटपाथचा काही भाग मुसळधार पावसात वाहून गेल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चार ते पाच महिन्यापूर्वी बसवलेले कळंबोली मच्छी मार्केट येथील फुटपाथ वरील पेव्हर ब्लॉक उखडले व खचले असल्याची घटना समोर आली असतानाच आज पुन्हा फुटपाथ खचल्याची घटना समोर आल्याने विकासकांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे फुटपाथच्या कडील माती वाहून गेल्याने मोठा भाग खचला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या मार्गावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्यामुळे पहिल्याच पावसात फुटपाथची अशी अवस्था झाली आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही दर्जेदार काम न झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांनी पनवेल महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने या फुटपाथची दुरुस्ती करून दोषी अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच भविष्यात विकासकामांचा दर्जा काटेकोरपणे तपासूनच कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
