सोलापूर प्रतिनिधी
अकलूजमधील १०७० झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या घरांच्या नियमितीकरण प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्य शासनाच्या १ जानेवारी २०११ पूर्वीच्या शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या धोरणानुसार पात्र नागरिकांना कायदेशीर मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
नगरसेविका सौ. दिपालीताई वाघमोडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे १०७० झोपडपट्टी परिसरातील ७४ पात्र लाभार्थ्यांचा अतिक्रमण नियमितीकरणाचा परिपूर्ण प्रस्ताव अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर करण्यात आला. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना त्यांच्या घराचा कायदेशीर मालकी हक्क मिळणार असून, घरकुल योजना, पाणी, वीज यांसारख्या शासकीय सुविधांचा अधिकृत लाभ घेणे शक्य होणार आहे. तसेच बेघर होण्याची भीतीही दूर होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नगरसेविका सौ. जयश्रीताई एकतपुरे, नगरपरिषद गटनेते राहुल लोंढे, भारतीय जनता पार्टी अकलूज शहर सरचिटणीस अमोल बाळासाहेब माने, भाजप चिटणीस संतोष वाघमोडे आदी उपस्थित होते.
“अनेक वर्षांपासून हक्काच्या घरासाठी संघर्ष करणाऱ्या १०७० झोपडपट्टीतील बांधवांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रशासनाच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,” असे मत नगरसेविका सौ. दिपालीताई वाघमोडे यांनी व्यक्त केले.
या सकारात्मक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले जात आहेत.








