उदगीर-जळकोट मतदारसंघातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांचा आढावा
उदगीर प्रतिनिधी
“शेतकरी हा देशाचा कणा असून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा, सिंचन व्यवस्था आणि पीकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असे स्पष्ट मत माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
उदगीर शहरातील पंचायत समिती सभागृहात खरीप हंगाम २०२६ च्या अनुषंगाने आयोजित पूर्वनियोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. उदगीर-जळकोट मतदारसंघातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, गटनेते रामचंद्र तिरुके, जि.प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी, दिलीपकुमार मटके, मुकेश भालेराव, उषा भुजबळे, पंचायत समिती सभापती वनमाला मरलापल्ले, जळकोट नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्षा मन्मथ किडे, उपसभापती बापुसाहेब भोसले, तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी संदीप वालकुंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत कृषी, महसूल, वीज वितरण, सिंचन, खत व बियाणे पुरवठा तसेच पीकविमा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खरीप हंगामासाठी आवश्यक खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य योग्य दरात उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाला निर्देश देण्यात आले.
“खत व बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे आर्थिक पिळवणूक होऊ देऊ नका,” असे निर्देश आ. संजय बनसोडे यांनी दिले.
यावेळी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीवरही चर्चा करण्यात आली. पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच कृषी विभागाने गावागावांत जनजागृती मोहीम राबवून आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करावे, असेही सूचित करण्यात आले.
बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित विभागांनी दिले. आगामी खरीप हंगामासाठी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सकारात्मक समन्वय निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


