ब्रम्हपुरी | ता. १९ मे २०२६
देशात लवकरच होणाऱ्या जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, अन्यथा अशा जनगणनेला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात ब्रम्हपुरी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशातील ओबीसी समाज हा मोठा सामाजिक घटक असूनही आजपर्यंत त्यांच्या अचूक लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय योजनांचे योग्य नियोजन करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र जनगणना आकडेवारी अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच भारताच्या संविधानाने सर्व समाजघटकांना समान न्याय व प्रतिनिधित्वाचा अधिकार दिलेला असताना ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवणे ही सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला बाधा पोहोचवणारी बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. भविष्यात आरक्षण, शासकीय योजना, निधी वाटप तसेच विविध विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भूमिकाही काँग्रेस ओबीसी सेलने मांडली.
आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करून स्वतंत्र ओबीसी जनगणना करण्यात यावी, अशी ठाम मागणी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली. अन्यथा अशा अपूर्ण जनगणनेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
शासन स्तरावर ही मागणी तातडीने पाठवून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी विनंती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
यावेळी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष राकेश पडोळे, कार्याध्यक्ष वामन मिसार, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, नगराध्यक्ष योगेश मिसार, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रदेश काँग्रेस सचिव थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


