ब्रम्हपुरी | ता. १८ मे २०२६
गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळ, एमआयडीसी आणि इतर विविध प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध होत असतानाही शासन विविध प्रकल्पांसाठी जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. प्रस्तावित विमानतळासाठी गडचिरोली तालुक्यातील गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही बळजबरीने प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १४ गावांतील शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींना स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन कुणाच्याही शेतजमिनी एमआयडीसीसाठी घेतल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित गावांतील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“माती ही आमची माय असून तिच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार,” असा निर्धार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. शेतकऱ्यांची भूमिका हीच आमची भूमिका आहे,” असे स्पष्ट केले.
तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार न केल्यास ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनात विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, महिला भगिनी, युवक, काँग्रेस कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


