माहूर | प्रतिनिधी
माहूर तालुक्यातील आष्टा येथील श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आकांक्षा जयवंत वाघमारे हिने दहावी बोर्ड परीक्षेत ८९.२० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही तिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
आकांक्षा ही सुरुवातीपासूनच अभ्यासू, शांत आणि मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. शाळेतील विविध शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तिच्या या यशामुळे विद्यालय, गाव आणि संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तिच्या या यशाबद्दल निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष मा. गणेश कचकलवार साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष समाधान कांबळे, शहराध्यक्ष कुंदन तिवडकर, निर्भय समाजकार्य तालुका अध्यक्ष तसेच युवा आघाडी तालुका अध्यक्ष आदेश भाऊ बेहेरे आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
या यशामागे तिचे आई-वडील, शिक्षकवृंद तसेच कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः तिचे काका प्रा. आशिष वाघमारे यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, प्रेरणा आणि शैक्षणिक सहकार्य यामुळे आकांक्षाला मोठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळाल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
गावातील ग्रामस्थ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आकांक्षाचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी आदर्श कार्य करण्याची इच्छा आकांक्षाने व्यक्त केली असून, आपल्या यशाचे श्रेय शाळेचे प्राचार्य राजेंद्रजी केशवे सर, शिक्षकवृंद, आई-वडील, काका प्रा. आशिष वाघमारे आणि गावकऱ्यांना दिले आहे.









