हिंगोली | प्रतिनिधी
डीएपी खतांचा तुटवडा, बियाण्यांची हमी नसणे, डिझेलची कमतरता, कालव्यांत पाणी नसणे, बँकांमध्ये रोख रकमेची अडचण तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंगा फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
संघटनेच्या वतीने दि. २१ मे रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनात शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात काही काळ शाब्दिक चकमकही झाल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी बाजारात डीएपी खत उपलब्ध नसल्याचा, कृषी केंद्रांवर बियाण्यांची हमी नसल्याचा तसेच पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याचा आरोप केला. कालव्यामध्ये पाणी नसल्याने शेतीची कामे ठप्प होत असून, बँकांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक रोख रक्कम उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. हळदीसह इतर शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
संघटनेने शासनाकडे शेतकऱ्यांना तात्काळ डीएपी खत व बियाणे उपलब्ध करून देणे, ट्रॅक्टरसाठी डिझेलचा पुरेसा पुरवठा करणे, पिक विमा तातडीने वितरित करणे, शेतीमालाला योग्य हमीभाव देणे, कालव्यामध्ये पाणी सोडणे तसेच बेरोजगार तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याची मागणी केली.
“शासनाने तातडीने प्रश्न सोडवले नाहीत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तरीही संघटनेने आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली.
या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सेनगाव तालुका अध्यक्ष प्रवीण मते, कळमनुरी तालुका अध्यक्ष चैतन्य चव्हाण, राम चव्हाण, रमेश जाधव, गजानन काळे, शांतीराम सावके, ज्ञानेश्वर बोंढारे, सुभाषराव गाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते.









