अंबाजोगाई/प्रतिनिधी
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरापर्यंत पोहोचले आहेत. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी दि. २१ मे रोजी अंबाजोगाई येथे धडक कारवाई करत दोन संशयित विद्यार्थ्यांची तब्बल तीन तास कसून चौकशी केली. या कारवाईमुळे मराठवाड्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही विद्यार्थी लातूर येथे राहून NEET परीक्षेची तयारी करत होते. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्यांनी गैरमार्गाने अथवा आर्थिक देवाणघेवाण करून प्रश्नपत्रिका मिळवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता थेट अंबाजोगाईत धडक देत विद्यार्थ्यांचा शोध घेतला.
सूत्रांच्या माहितीनुसार, एका गुप्त ठिकाणी या दोन्ही विद्यार्थ्यांची सुमारे तीन तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन, मेमरी कार्ड आणि इतर डिजिटल साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, लातूर हे राज्यातील कोचिंग क्लासेसचे मोठे केंद्र मानले जाते. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे लातूरमधील एखाद्या मोठ्या रॅकेटशी जोडले गेले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सीबीआयच्या तपासातून आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत झाला आहे. आता या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत आणि त्यामागे कोणाचा हात आहे, हे उघड करण्याचे मोठे आव्हान सीबीआयसमोर उभे ठाकले आहे.







