चंद्रपूर/प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या १३ महिलांवर वाघाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही परिसरातील महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी महिला सैरावैरा पळू लागल्या आणि मदतीसाठी आक्रोश करू लागल्या. मात्र जंगल परिसर असल्याने त्यांना तातडीने मदत मिळू शकली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाघाने अत्यंत आक्रमकपणे काही महिलांवर सलग हल्ले केले. या हल्ल्यात कवडूबाई दादाजी मोहुर्ले, अनुबाई दादाजी मोहुर्ले, सुनिता कौशिक मोहुर्ले आणि संगीता संतोष चौधरी या चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित महिलांनी कसाबसा जीव वाचवत जंगलातून बाहेर पडण्यात यश मिळवले.
या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जंगलात उपजीविकेसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, चार महिलांचे बळी घेणाऱ्या या कथित “आदमखोर” वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने शोधमोहीम सुरू केली आहे. वन अधिकाऱ्यांची पथके परिसरात तैनात करण्यात आली असून, नागरिकांना जंगल परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






