फलटण : शहरातील वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणारी गुन्हेगारी लक्षात घेता फलटणमध्ये कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) तसेच एमपीडीए सारख्या प्रतिबंधात्मक कायद्यांचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
तसेच शहराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, नियमित नाकाबंदी, कॉम्बिंग ऑपरेशन राबविणे आणि सराईत गुन्हेगारांना तडीपार करून शहराबाहेर हद्दपार करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“फलटण शहरात कायद्याचा धाक निर्माण करून नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. शहर गुन्हेगारी, दहशत आणि भीतीमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तेजस भोसले, तुषार जाधव आणि सनी पवार उपस्थित होते.
दरम्यान, या मागणीवर पोलिस उपअधीक्षक (DYSP) आणि शहर पोलिस निरीक्षक कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.











