प्रतिनिधी | वर्धा
कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका रुग्णाच्या उपचारप्रकरणी गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बशीर सुलेमान बेग (वय ७४, रा. गोंड मोहल्ला, आंबेडकर गार्डनजवळ, वर्धा) यांना दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना मेडिसीन विभाग ३३ मध्ये हलविण्यात आले.
नातेवाईकांच्या आरोपानुसार, संबंधित डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगून पुढील उपचारांसाठी ४७ हजार रुपयांच्या आसपास रक्कम भरण्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी ४६ हजार ६९६ रुपये भरून रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल केले.
मात्र काही दिवसांनंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी रुग्णाला अन्यत्र हलविण्याबाबत विचारणा केली असता, “उद्या शव घरी घेऊन जाऊ शकता,” असे कथित उत्तर संबंधित डॉक्टरांनी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी आर्थिक जुळवाजुळव करून रुग्णाला नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविले.
या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून डॉ. शुक्ला तसेच डॉ. पुनम वर्मा यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालून मेडिसीन विभागातील संबंधित डॉक्टरांविरुद्ध योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.












