हजारो झाडे कोसळली; द्राक्ष, केळी, ऊस आणि आंबा बागांचे मोठे नुकसान
जालना | दि. २४
आष्टी आणि कोकाटे हादगाव सर्कलमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांचे शेतातील सोलार पॅनल उखडून पडले असून काही ठिकाणी ती वाऱ्यामुळे उडून गेली आहेत. तसेच शेडनेट, पॉलिहाऊस आणि जनावरांसाठी उभारलेले निवारे देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. द्राक्ष, केळी आणि आंबा बागांचे मोठे नुकसान झाले असून उभा असलेला ऊसही जमिनीवर आडवा पडला आहे.
दरम्यान, फुलवाडी येथील अर्जुन गणेश घनवट यांच्या शेतात वीज पडून एक बैल जागीच ठार झाला. तसेच झाडाखाली आसरा घेतलेल्या मनीषा विराज शेळके यांच्या अंगावर लिंबाच्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती भाजपाचे तुकाराम सोळंके आणि लोणीचे सरपंच गजानन लोणीकर यांनी दूरध्वनीद्वारे बबनराव लोणीकर यांना दिली. माहिती मिळताच आमदार लोणीकर यांनी परतूरचे तहसीलदार जाधव तसेच उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तात्काळ राज्य शासनाकडे पाठवून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासनही आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.








