पाबळ | प्रतिनिधी
पाबळ ते कनेरसर या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून नागरिक, कामगार आणि वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजगुरूनगर–पाबळ मार्गावरील कनेरसर–पाबळ MIDC दरम्यानचा सुमारे सहा ते सात किलोमीटरचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला आहे.
अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी पाबळ आणि कनेरसर येथे ग्रामस्थांनी दोन वेळा आंदोलने केली होती. आंदोलनानंतर प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. तसेच संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र चार ते पाच महिने उलटूनही प्रत्यक्ष डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी रस्ता खचला असून वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हा रस्ता MIDC कडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. ट्रक, कंटेनर आणि इतर जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली आहे.
MIDC मधील कर्मचारी, शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच रोजंदारी करणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
“दोन वेळा आंदोलने झाली, आश्वासने मिळाली, खड्डे बुजवले गेले; मात्र कायमस्वरूपी उपाय अजूनही झालेला नाही. प्रशासन आणि सरकारला जाग कधी येणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि वाहनचालकांकडून या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून सुरक्षित प्रवासासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.









