वर्धा | प्रतिनिधी
वर्धा येथे अधिक मासानिमित्त कुटुंबासह नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० वर्षीय मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोटेश्वर येथील वर्धा नदी परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज प्रकाश तवाडे (वय ४५, रा. वर्धा) हे आपल्या कुटुंबासह अधिक मासानिमित्त कोटेश्वर नदीवर आंघोळ व दर्शनासाठी गेले होते. सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास कुटुंबीय नदीकाठी आंघोळ करत असताना त्यांची मुलगी भक्ती मनोज तवाडे (वय १०) हिचा अचानक पाय घसरून ती पाण्यात पडली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि उपस्थित नागरिकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर भक्ती हिचा मृतदेह पाण्याच्या तळाशी आढळून आला. तिला तातडीने बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र, भिडी येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास संदीप कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार विनोद कांबळे करीत आहेत.










