मुक्ताईनगर | प्रतिनिधी
पावसाळा तोंडावर आलेला असताना शेती मशागतीसाठी आवश्यक असलेले डिझेल व पेट्रोल शेतकऱ्यांना विनाअट आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व्हिजेएनटी विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले यांनी केली आहे.
सध्या डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर, रोटावेटर, ट्रिलर आणि इतर शेती मशागतीची कामे ठप्प झाली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोल पंपांवर डिझेल घेण्यासाठी आधार कार्ड, सातबारा यांसारखी कागदपत्रे मागितली जात असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
“शेतकऱ्यांना मशागतीची कामे सोडून ट्रॅक्टर घेऊन तासनतास पेट्रोल पंपांवर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि पैसा तिन्ही गोष्टींचे नुकसान होत आहे,” असेही वाडीले यांनी सांगितले.
कपाशी लागवडीचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर नागरट, रोटावेटर व पेरणीची कामे वेळेत पूर्ण होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दीमुळे वाद आणि मारामाऱ्या होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शेजारील मध्यप्रदेश राज्यात डिझेल-पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याचा दावा करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही विनाअट इंधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.









