नवी मुंबई प्रतिनिधी:
नवी मुंबईतील वाशी हायवे ब्रिजवर आज एक धक्कादायक घटना घडली. पुण्याहून गुजरात मधील राजकोटच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मनीष ट्रॅव्हल्स या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच महामार्गावर काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही खासगी लक्झरी बस वाशी हायवे ब्रिजवरून जात असताना अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना त्वरित खाली उतरण्याचे आवाहन केले. प्रवासी खाली उतरत असतानाच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. चालकाच्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाशी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर बसला लागलेली आग आटोक्यात आणली. या आगीत बसचे प्रचंड नुकसान झाले असून बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.वाहतूक काही काळ विस्कळीत, आगीचे कारण अस्पष्टया भीषण आगीमुळे वाशी हायवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती आणि रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर हायवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस जास्त गरम झाल्यामुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात असून पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.











