पनवेल प्रतिनिधी:
चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल शोधण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. गुन्हे शाखा कक्ष ३ (पनवेल) च्या पथकाने तब्बल ३९ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १३० मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. शनिवारी पनवेल येथील गुन्हे शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. आपले हरवलेले फोन परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू पाहायला मिळाले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोबाईल चोरी आणि गहाळ होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि सायबर सेलच्या मदतीने शोधमोहीम राबवली. अत्यंत कौशल्याने तपास करत पोलिसांनी विविध कंपन्यांचे १३० महागडे मोबाईल फोन शोधून काढले.
मोबाईलमध्ये नागरिकांचा अत्यंत महत्त्वाचा वैयक्तिक डेटा, बँक खात्यांची माहिती आणि फोटो असतात. फोन परत मिळण्याची आशा सोडलेल्या अनेक नागरिकांना जेव्हा पोलिसांकडून फोन नेण्यासाठी बोलावणे आले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. नागरिकांनी नवी मुंबई पोलिसांच्या तत्परतेबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.’
पत्रकार परिषदेत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) प्रेरणा कट्टे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. “नागरिकांचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल ब्लॉक करावा, जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही,” असे आवाहन कट्टे यांनी केले आहे.
सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलचे वपोनि अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वाखाली सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, माधव इंगळे, सफौ अनिल पाटील, रमेश शिंदे, पोहवा प्रशांत काटकर, प्रमोद राजपूत, निलेश पाटील, दिपक डोंगरे, सागर रसाळ, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, अजित पाटील, हिरकणी पाटील, पो.ना. आजिनाथ फुंडे, विनया पाटील, पो.शि. लवंकुश शिंगाडे, विक्रांत माळी, प्रसाद घरत,पोहवा इंद्रजित कानु, गुन्हे शाखा कक्ष ३ आदींच्या पथकाने सीईआयआरपोर्टल वर गहाळ झालेल्या मोबाईल फोनची तसेच संबंधीत फोन धारकाची आवश्यक ती माहिती भरल्यानंतर सदर हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हदितील गहाळ झालेल्या मोबाईल फोन पैकी मागील तीन महिन्यात महाराष्ट्र राज्यातील तसेच परराज्यातील अंदाजे 39,75,000/-रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे एकुण 130 मोबाईल फोन संबंधीत मोबाईल धारकांना परत देवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.











