बीड शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्नसमारंभादरम्यान करण्यात आलेली फटाकेबाजी अचानक जीवघेणी ठरली. सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता करण्यात आलेल्या आतषबाजीत फोटोग्राफर अभिषेक गोरख कदम हे गंभीररीत्या भाजले गेले.
या भीषण दुर्घटनेत अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे कॅमेरे, लेन्स आणि इतर महागडी उपकरणे जळून खाक झाली आहेत. तसेच काही अन्य फोटोग्राफर आणि कॅमेरा ऑपरेटर देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर जखमींना नुकसानभरपाई देण्यात यावी, नुकसानीचा अधिकृत पंचनामा करण्यात यावा तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी मंगल कार्यालयांमधील धोकादायक फटाकेबाजीवर कठोर नियम लागू करावेत, अशी मागणी अभिषेक कदम यांचे वडील गोरख कदम तसेच बीड फोटोग्राफर युनियन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.












