📍 बीड जिल्ह्यातील घटना
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने स्वतःच्या दोन लहान मुलांना एसटी बसमध्ये एकटे सोडून प्रियकरासोबत पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने आपल्या दोन मुलांना पंढरपूर-संभाजीनगर एसटी बसमध्ये बसवून त्यांच्या खिशात एक चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीत “या मुलांचे आई-वडील हयात नाहीत, त्यांना यवतमाळच्या बसमध्ये पाठवून द्या,” असा मजकूर लिहिलेला होता. तसेच मुलांच्या आजोबांचा मोबाईल क्रमांकही नमूद करण्यात आला होता. त्यानंतर महिला प्रियकरासोबत स्कूटीवरून निघून गेल्याची माहिती आहे.
दरम्यान, प्रवासादरम्यान बस वाहकाच्या लक्षात आले की दोन्ही मुले एकटीच बसमध्ये रडत आहेत. संशय आल्याने वाहकाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चिठ्ठीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मुलांच्या आजोबांना बीड येथे बोलावून घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या वडिलांनी यापूर्वीच मुलगी रोख रक्कम आणि दुचाकीसह घरातून गेल्याची तक्रार यवतमाळ पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून निष्पाप मुलांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.











