📍 जळगाव प्रतिनिधी
रेल्वे भरती २००७ अंतर्गत मेडिकल पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रलंबित नियुक्तीच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. तब्बल १३ वर्षांपासून अनेक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून, वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, रेल्वे भरती प्रक्रियेत सर्व टप्पे पूर्ण करून मेडिकल पात्र ठरूनही आजपर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेकडो युवकांचे भविष्य अंधारात गेले असून त्यांच्या शिक्षण, मेहनत आणि कुटुंबीयांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
उपोषणादरम्यान उमेदवारांनी “न्याय द्या, नियुक्ती द्या”, “आमचा हक्क – आमची नोकरी” अशा घोषणा देत रेल्वे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाची दखल विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून घेतली जात असून मेडिकल पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.











