📍 लोणी | प्रतिनिधी :
ग्रामस्थांच्या दुःखाच्या प्रसंगी प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढे येत मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने लोणी ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत गावातील दिवंगत नागरिकांच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच त्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीच्या वतीने मृत्यू दाखला आदरपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात कै. सुखदेव येधू गायकवाड यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी गायकवाड कुटुंबीयांना मृत्यू दाखला प्रदान करत श्रद्धांजली व संवेदना व्यक्त केल्या.
ग्रामपंचायतीने स्पष्ट केले की हा उपक्रम केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून, गावासाठी योगदान दिलेल्या व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे. तसेच शोकाकुल कुटुंबियांना दाखल्यासाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, हा देखील या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
यासोबतच ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी नियमित भरण्याचे महत्त्वही अधोरेखित केले असून, नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना सेवा अधिक वेगाने उपलब्ध होतात, असा संदेश देण्यात आला आहे.
या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, इतर ग्रामपंचायतींनीही असा आदर्श घ्यावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
या प्रसंगी अशोक आदक पाटील, बबन वाळुंज पाटील, संतोष थोरात आणि राजेंद्र वाळुंज पाटील (उपसरपंच, लोणी) उपस्थित होते.











