ऋतुजा पालखे आत्महत्या प्रकरण तापले; आरपीआयचे संजय शिंदे आक्रमक
कोल्हापूर जिल्ह्यातील ऋतुजा पालखे आत्महत्या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपामुळे हेरवाड व परिसरात जनक्षोभ तीव्र झाला आहे.
या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून ऋतुजाला न्याय मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
याआधी कुंभोज येथे ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर हेरवाड येथेही मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनांमुळे परिसरातील वातावरण ढवळून निघाले असून नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.
संजय शिंदे यांनी मागणी केली की, या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि कोणालाही पाठीशी घालू नये. “ऋतुजा पालखे हिला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी रिपब्लिकन पार्टीचे हातकणंगले जिल्हा उपाध्यक्ष शुभम कांबळे आणि विक्रम माने उपस्थित होते.








